उद्या भारत बंद! ‘हे’ आहे कारण.. काँग्रेसही रस्त्यावर उतरणार, काय चालू-काय बंद? Bharat Bandh

Bharat Bandh: केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविरोधात देशभरात तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून त्याच पार्श्वभूमीवर गुरुवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी संयुक्तपणे हा बंद पुकारला असून विविध शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. या भारत बंदला आता राजकीय पातळीवरही बळ मिळाले असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अधिकृतपणे या बंदला समर्थन जाहीर केले आहे.
कामगार कायद्यांतील नव्या बदलांमुळे कामगारांच्या नोकरीतील सुरक्षितता, वेतन संरचना, संघटन स्वातंत्र्य आणि सामाजिक संरक्षण यावर गदा येत असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जात आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारचे धोरण हे कामगार व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत, या बदलांविरोधात देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.
या भारत बंदमध्ये देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना सहभागी होत आहेत. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. चार नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांचे मूलभूत अधिकार हिरावले जात असून खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
भारत बंदचा सर्वसामान्य जनजीवनावर कितपत परिणाम होईल, याबाबत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती दिसण्याची शक्यता आहे. देशपातळीवर शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत आदेश देण्यात आलेला नाही. मात्र केरळ, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात ठप्प होऊ शकते. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थानिक पातळीवर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
बँकिंग क्षेत्रावरही या भारत बंदचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारी रोजी बँकांचे व्यवहार काही प्रमाणात विस्कळीत होऊ शकतात. तथापि, रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकारकडून त्या दिवशी अधिकृत बँक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही ग्राहकांना शाखांमधील सेवा, धनादेश क्लिअरन्स आणि इतर व्यवहारांमध्ये अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, कामगार कायद्यांवरील विरोध, शेतकरी संघटनांचा पाठिंबा आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा सहभाग यामुळे उद्याचा भारत बंद राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. बंदचा नेमका परिणाम राज्यनिहाय वेगळा असला तरी, केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील हा असंतोष देशभरात ठळकपणे व्यक्त होण्याची शक्यता आहे.

