Kolhapur Crime: वाशी येथील बिरदेव यात्रेत मानपानावरुन दोन गटात राडा.. दगडफेक, परस्पर विरोधी गुन्हे दाखल
Hello Kolhapur | वाशी (ता. करवीर) येथे सुरू झालेल्या बिरदेव वार्षिक यात्रेच्या (Vashi Birdev Yatra) पहिल्या दिवशी पालखी सोहळ्यादरम्यान मानपानाच्या वादातून रानगे आणि पुजारी गटांमध्ये बाचाबाची झाली. याचे पडसाद दगडफेकीत उमटले.
यामध्ये मानकरी उदयानीदेवी साळुंखे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने करवीर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेचा यात्रेवर कोणताही परिणाम होणार नसून यात्रा सुरळीत पार पडेल, असे यात्रा अध्यक्ष सरपंच शिवाजी जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
बिरदेव यात्रेला चार राज्यांतील भाविक उपस्थित असतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी भानुस मंदिरातून मुख्य मंदिरात देव नेण्याचा सोहळा पार पडतो. यावेळी पालखी सोहळा काही अंतरावर गेल्यानंतर रानगे आणि पुजारी गटातील काही मंडळींमध्ये पालखी जवळ थांबण्याचा आणि भंडारा उधळण्याचा मान घेण्यावरून वाद झाला. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
गावातील प्रमुख मंडळींनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. या घटनेमुळे यात्रेच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


