विधी व न्याय विभागात टंकलेखकांच्या ५ हजार २२३ पदांची निर्मिती, भरती लवकरच.. | Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2025

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2025: राज्यातील न्यायालयीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (27 मे रोजी) झालेल्या बैठकीत न्यायिक अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ५ हजार २२३ टंकलेखक पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली. यासोबतच २ हजार ८६३ नवीन न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदांनाही मान्यता देण्यात आली, तर याआधी मंजूर असलेली २ हजार ३६० पदे यामध्ये समाविष्ट आहेत.
या निर्णयामुळे जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ व कनिष्ठ स्तर) यांच्या कामकाजात गती येणार असून, प्रलंबित खटल्यांच्या निवारणालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इचलकरंजी आणि जालना या नव्याने निर्माण झालेल्या महापालिकांना वस्तू व सेवाकर (GST) भरपाईपोटी अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे पुढील पाच वर्षांत इचलकरंजी महापालिकेला ६५७ कोटी रुपये, तर जालना महापालिकेला ३९२ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय:
- रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस ७५ अनिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष बाब म्हणून अनुदान तत्वावर मान्यता.
- नागपूर : पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या करारातील अटी व शर्तींमध्ये बदलास मंत्रिमंडळाची मान्यता.
- महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या १,३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता.
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास मान्यता.
- कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात बदल करत त्यांना अनुक्रमे ‘उप कृषि अधिकारी’ आणि ‘सहाय्यक कृषि अधिकारी’ अशी नवीन पदनावे देण्यास मान्यता.


