बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता! लवकरच मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन धावणार | Vande Bharat Train

कोल्हापूरकरांसाठी एक अत्यंत सुखद बातमी आहे – लवकरच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू होणार आहे! या गाडीच्या आगमनामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायक आणि आधुनिक होणार आहे.

वर्षानुवर्षे असलेली मागणी अखेर फळाला!
मुंबई आणि कोल्हापूर यांच्यातील रेल्वे प्रवासावर चांगली कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. कोल्हापूरच्या हजारो नागरिकांचे व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक कारणांमुळे मुंबईकडे येणे-जाणे असते. तसंच मुंबईतील अनेक पर्यटक देवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला येतात. त्यामुळे या मार्गावर अधिक गाड्यांची गरज सतत भासत होती.

प्रवाशांची हीच गरज लक्षात घेऊन क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेनची जोरदार मागणी करण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कधीपासून सुरू होणार सेवा?
या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस येत्या १५ दिवसांत धावण्याची शक्यता आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी माहिती दिली की, “ही ट्रेन थेट मुंबईपर्यंत धावणार असून तिचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.” वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भाड्याची रचना आणि थांब्यांची माहिती देखील स्पष्ट होईल.

सध्या धावत असलेली पुणे-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन
कोल्हापूर-पुणे दरम्यान आधीच मिनी वंदे भारत ट्रेन धावत आहे. ही ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून ३ दिवस धावते. ८ डब्यांची ही ट्रेन एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसह उच्च प्रतीच्या सुविधा देते.

वंदे भारत ट्रेन – आधुनिक भारताची ओळख
भारतीय रेल्वेने विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस ही आजच्या युगातील प्रवासाची खरी ओळख ठरत आहे. 160 किमी/तास इतक्या वेगाने धावणारी ही ट्रेन संपूर्णपणे वातानुकूलित असून प्रत्येक कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे, एलसीडी माहिती स्क्रीन, व्हॅक्युम बायो-टॉयलेट्ससारख्या सुविधा दिल्या आहेत. पारंपरिक गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत ट्रेन ३०% कमी वेळात गंतव्यस्थानी पोहोचते.

Back to top button