कोल्हापूर जिल्ह्यातील कृषि सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन | Agriculture Assistants Protest
कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन (Agriculture Assistants Protest) करण्यात आले. हे आंदोलन राज्यभर सुरु असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाचा एक भाग होता.
संघटनेच्या मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे यांना देण्यात आले.

राज्यातील साडे आठ हजार कृषी सहाय्यकांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाचे परिणाम थेट खरिपाच्या नियोजनावर होऊ लागले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनामुळे पोकरा, स्मार्ट, पीएम किसान यासारख्या मुख्य योजनांची कामे ठप्प झाली आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतरची पंचनाम्याची कामे झालेली नाहीत. बीज प्रक्रिया मोहिमा, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके, खरीप हंगामपूर्व होणाऱ्या गाव बैठका अशी विविध कामे झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: Agriculture Assistants Protest
- प्रलंबित न्याय्य मागण्यांची तात्काळ सोडवणूक
- कृषि सहाय्यकांच्या सेवा शर्तीतील सुधारणा
- कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती
- पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम निर्मित करावे
- कामाचे योग्य मूल्यमापन व सन्मान करावा
संघटनेने आधीच इशारा दिला होता की मागण्या मान्य न झाल्यास,
- 19 मे 2025 रोजी सर्व जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयांसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन
- 21 मे 2025 रोजी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन
- आणि तरीही मागण्या मान्य न झाल्यास पुणे येथे कृषि आयुक्त कार्यालयासमोर अंतिम टप्प्याचे धरणे आंदोलन आणि उपोषण
आज झालेल्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो कृषी सहाय्यक सहभागी झाले होते. त्यांनी विविध घोषणा देत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला आणि शेतकऱ्यांची कामे खोळंबल्यास यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशारा दिला.
कृषी सहाय्यकांनी पुकारलेले आंदोलन राज्यव्यापी असल्याने, या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. खरीपाच्या तोंडावरच कृषी सहाय्यकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली असून, याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आता शेतकरी वर्गाकडून तसेच विविध संघटनांकडून केली जात आहे.


