बातम्या

महाराष्ट्र केसरीचा वाद सांगलीत मिटणार! पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे एकमेकाला भिडणार | Prithviraj Mohol-Shivraj Rakshe

सांगली | नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वाद संपूर्ण राज्यभर गाजत असताना आता हा वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ आणि उपविजेता मल्ल शिवराज राक्षे हे दोघे पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार झाले असून, सांगली येथे त्यांच्यात कुस्ती होणार आहे.

महाराष्ट्र केसरीच्या निकालावरुन वाद

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. उपविजेता शिवराज राक्षे याने संतापाच्या भरात पंचाला लाथ मारली होती. यावर प्रतिक्रिया देताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पंचांवर टीका करत, महाराष्ट्र केसरीची दोन्ही गदा परत करण्याचा इशारा दिला होता.

मोहोळ-राक्षे यांच्यात सांगलीत सामना

या संपूर्ण वादानंतर सोशल मीडियावर मोहोळ आणि राक्षे यांच्यात पुन्हा सामना घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर, पै. मोहोळ आणि पै. राक्षे यांनी पुन्हा एकदा कुस्ती लढण्याची तयारी दर्शवली आहे.

२५ लाखांचे बक्षीस

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी सांगलीत हा सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा हा वाद अखेर सांगलीत मिटणार असल्याची शक्यता आहे.

‘निर्विवाद कुस्ती महाराष्ट्राला दाखवणार’ – पै. चंद्रहार पाटील

“सांगलीला कुस्तीची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र केसरीसाठी पै. मोहोळ आणि पै. राक्षे यांची कुस्ती येथेच लावणार आहे. निर्विवाद कुस्ती कशी असते हे मी महाराष्ट्राला दाखवून देईन. या कुस्तीसाठी मी स्वत: प्रत्येकी २५ लाख रुपये देणार आहे. या लढतीनंतर महाराष्ट्राचा हा वाद सांगलीत मिटेल.”
– पै. चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker