तात्या मला वाचवा, मला आत्महत्या करावी वाटते! पुणे बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ पीडितेने व्यक्त केली इच्छा! Pune Rape Case
Pune Rape Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची बाजू ॲड. असीम सरोदे न्यायालयात मांडणार आहेत. तसेच पीडितेची बदनामी थांबवण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. पीडित तरुणीला सध्या प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागत असून आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे तिने सांगितल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली.
पीडित तरुणी मानसिक तणावाखाली – वसंत मोरे
ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “पीडित तरुणी आणि तिच्या मित्राचा मला फोन आला होता. आरोपीची पत्नी प्रत्येक अधिकाऱ्याला रडून सांगत आहे, मात्र पीडितेला न्याय मिळत नाही.”
मोरे पुढे म्हणाले, “आरोपी सुखात कोठडीत बसला आहे, मात्र पीडितेला बसवून ठेवले जात आहे. पोलिसांनी ७५०० रुपये दिले असते तर पीडितेची बॅग पोलीस ठाण्यात होती. त्या बॅगेची तपासणी का झाली नाही? आम्ही न्यायालयाकडे मनाई आदेशासाठी अर्ज दाखल केला आहे.”
पीडितेवर असंवेदनशील वक्तव्य – ॲड. असीम सरोदे
असीम सरोदे यांनी सांगितले की, पीडित तरुणीबाबत ज्या प्रकारची वक्तव्ये करण्यात आली आहेत, ती असंवेदनशील आहेत. पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, माध्यमांनी अधिकृत नसलेल्या गोष्टी प्रसारित करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बलात्कारानंतर जीवदानाची याचना
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर पीडित तरुणीने आरोपी दत्ता गाडेकडे जीवदानाची याचना केली होती. घाबरल्यामुळे तिने आरडाओरडा केला नाही. आरोपीच्या वकिलांनी पीडितेने संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केल्याने ती तणावाखाली असून, तिच्या समुपदेशनासाठी दोन समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.
रूपाली ठोंबरे, मंत्री योगेश कदम, संजय सावकारे यांची असंवेदनशील वक्तव्ये
या प्रकरणात अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे, मंत्री योगेश कदम, मंत्री संजय सावकारे यांनी अत्यंत असंवेदनशील पणे वक्तव्य केल्याचे समोर आले होते. रूपाली ठोंबरे यांनी तर सरळसरळ आरोपीला क्लीन चीट देत फेसबुक पोस्टद्वारे हा प्रकार संमतीच्या संबंधानंतर व्यवहारातील पैशांवरून झाल्याचा दावा केला होता. तसेच यामुळे नाहक पुणे बदनाम झाल्याचे त्यांनी म्हणटले होते. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील फोर्सफुल प्रकार नसल्याचे म्हटले होते. तर “एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाहीत असं म्हणता येणार नाही. देशात म्हटलं तर घटना घडत असतात. तसेच कारवाई देखील सुरू असते. तसेच महिला असो किंवा पुरुष असो सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजेत”, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं होतं.


