Santosh Deshmukh हत्याप्रकरणी 1500 पानांची चार्जशीट दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा…
Santosh Deshmukh: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 83 दिवस झाले असूनही आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या प्रकरणातील सीआयडीने आज बीड न्यायालयात 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सीआयडी प्रमुख बसवराज तेली, तपास अधिकारी अनिल गुजर आणि किरण पाटील यांनी न्यायालयात हे आरोपपत्र सादर केले. यातून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सत्य समोर येणार असल्याची शक्यता आहे. देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच झाल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला? हत्या कशी झाली? त्यासाठी कोणते ठिकाण निवडले? तसेच आरोपींचा गुन्हेगारी इतिहास काय आहे? याबाबतचे पुरावे या चौकशीतून समोर येतील.
सुरेश धस यांची प्रतिक्रिया
सीआयडीने आरोपपत्र दाखल करताच भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मकोका, हत्या, खंडणी, अॅट्रोसिटी अशा सर्व प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. गुन्हेगारांना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यास जामीन मिळतो. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी जामिनाचा कोणताही पर्याय गुन्हेगारांसमोर ठेवलेला नाही,” असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले आहे.


